पिराचीवाडी येथे केंद्र शासनाच्या अॅनिमिया मुक्त भारत अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या अभियानात गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. मोहसीन शानेदिवान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी केली. रक्तक्षय (अॅनिमिया) आढळलेल्या रुग्णांना आयर्न गोळ्या व आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात आरोग्य सेवक डॉ. नितीन पातले, आरोग्य सेविका डॉ. मनीषा कांबळे, तसेच आशा सेविका रेखा संजय भोसले व राजश्री रविकुमार भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी नागरिकांना संतुलित आहार, हिरव्या पालेभाज्या, फळे व पोषणयुक्त अन्नाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नियमित तपासणी व योग्य आहारामुळे अॅनिमियावर नियंत्रण मिळवता येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, भविष्यात अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी आरोग्य विभागाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले.



